मुंबई: मध्यप्रदेशात आधीच सत्ता गमावलेल्या कॉंग्रेसला राजस्थानची सत्ताही सोडावी लागण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रातील सरकारही फार काळ टिकणार नाही, असे भाकित केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी केले.
राजस्थानमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी एक व्हिडीओ जारी करून प्रतिक्रिया दिली.
आठवले म्हणाले, सचिन पायलट यांच्या काँग्रेस सोडण्याच्या निर्णयाचे स्वागत, राजस्थान नंतर महारष्ट्रात सत्तांतर घडेल. राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस चे राजस्थान प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन काँग्रेस सोडण्याचा सचिन पायलट यांनी घेतलेला निर्णय योग्य असून त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहोत. राजस्थानच्या विकासासाठी सचिन पायलट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी खंबीर उभे राहावे.
राजस्थान मध्ये बहुमतासाठी 101 आमदारांची गरज आहे. सचिन पायलट यांनी त्यांना 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्यांनी जर 30 आमदारांचा पाठिंबा मिळविला तर भाजप कडे 78 आमदारांचे संख्याबळ असून सचिन पायलट यांच्या 30 आमदारांमुळे भाजप 108 आमदारांच्या बळावर राजस्थानात भाजपचे सरकार स्थापन होऊ शकते, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
मध्यप्रदेश मध्ये काँग्रेसच्या कमलनाथ चे सरकार जाऊन भाजपच्या शिवराज सिंह चौहान यांचे सरकार आले तसेच राजस्थानात काँग्रेस चे सरकार जाऊन भाजप चे सरकार येईल. राजस्थान नंतर महाराष्ट्रात ही सत्तांतर घडेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार जाऊन महाराष्ट्रात भाजप चे सरकार येऊ शकते, असा दावा देखील आठवलेंनी केला आहे.