मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदानावर दसरा घेण्यासाठी परवानगी दिली. महिन्याभरापासून शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली होती अखेर न्यायालयाने याबाबत निर्णय दिला आणि चित्र स्पष्ट झाले. न्यायालयाच्या या निर्णयानंतर विविध राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. मनसेने देखील शिवाजी पार्कवर होणाऱ्या मेळाव्याबाबत भाष्य केलं आहे.
न्यायालयाने उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिकांनी जल्लोष केला. ठिकठिकाणी फटाके फोडत कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला. मनसे नेते संदीप देशपांडेंनी देखील यावर एका वाक्यात टिपण्णी केली आहे. “वारसा मैदानाचा नसतो,विचारांचा असतो” अशा आशयाचे ट्विट देशपांडेंनी केले आहे.
वारसा मैदानाचा नसतो विचाराचा असतो
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 24, 2022
काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपच्या विविध नेत्यांच्या भेटी गाठी घेताना दिसून आले. त्यामुळे शिंदे गटाच्या मेळाव्यात राज ठाकरे देखील हजेरी लावू शकतात अशी चर्चा सुरु होती. न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे दसरा मेळावा घेणार असलयाचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता शिंदे गटाची पुढील रणनीती काय असेल याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.