मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुबंईत मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली आणि ते आता सगळीकडे फिरत आहेत, असे म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. याच टीकेला आता उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ते मुंबईतील वांद्रे येथील लहुजी वस्ताद साळवी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
राज ठाकरेंना उत्तर देताना, “मी हळूहळू बाहेर पडतोय. आपलं सरकार असताना दोन वर्षे करोनात गेली. नंतर माझी शस्त्रक्रिया झाल्याने सहा महिने गेले. त्यामुळे मला घराबाहेर पडता येत नव्हते. मी घराबाहेर पडत नसल्याने हा घराबाहेर पडत नाही, अशी टीका करण्यात येत होती. आता घराबाहेर पडलो, तर यांच्या पोटात गोळा यायला लागला आहे,” अशी अप्रत्यक्षपणे टीका उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर केली आहे.
“शिवशक्ती, भिमशक्ती आणि लहुशक्ती ही सर्व एकचा शक्तीची विविधं रुप आहेत. शिवशक्ती, भिमशक्ती आणि लहुशक्ती एकवटली तर त्यात सोबत जे जे येतात ते एकवटले तर प्रचंड मोठी ताकद फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशात उभी राहील. मुंबईत तुमची लोकसंख्या अडीच-तीन लाख असेल. पण, संख्या किती महत्त्वाची, हे निवडणुकीच्या वेळेला ठरतं. एखादा लढा उभा राहतो तेव्हा ढिगभर गद्दार सोबत असण्यापेक्षा मूठभर मर्द सोबत असणं गरजेचं आहे,” असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आगामी काळात नवीन समीकरण एकत्र येणार असल्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान, मुंबईतील नेस्को मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली आणि ते आता सगळीकडे फिरत आहेत, असे म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले होते.