मुंबई – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात गेल्यामुळे राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठा आरक्षणासाठी सरसावले असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.
सर्वोच्च न्यायालयात अडकलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्दावर केंद्र सरकारने भूमिका मांडावी, अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. तसेच मराठा आरक्षण अबाधित राहावे, त्याचवेळी एसईबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी केंद्राने भूमिका घ्यावी, असंही त्यांनी पत्रात नमूद केले.
दरम्यान राजधानी दिल्लीत मराठा आरक्षणाच्या मुद्दावर हालचालींना वेग आला आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, मंत्री विजय वडेट्टीवार आणि खासदार बाळू धानोरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. त्यापाठोपाठ भाजपनेते आशिष शेलार यांनी देखील पवार यांची दिल्लीत भेट घेतली होती. ही भेट देखील मराठा आरक्षणाच्या मुद्दावर होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यवर संवेदनशील असून ते केंद्र सरकारला या मुद्दावर लक्ष घालण्यासाठी पत्र पाठवणार असल्याचे महाविकास आघाडीतील नेत्यांनी म्हटले होते.