नागपूर – शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी इतरांची खिल्ली उडवणे थांबवावे अन्यथा त्यांच्या पाठीशी उभे असलेले पक्षातील अन्य सदस्यही पक्ष सोडून जातील, असा इशारा भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, राज्यातील जनतेसाठी 18 तास काम करणाऱ्या एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारवर लोकांचा विश्वास आहे. 2024 पर्यंत इतर पक्षातील अनेक चांगले कार्यकर्ते भाजपमध्ये सामील होतील. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसेल. जर उद्धव ठाकरेंनी इतरांची खिल्ली उडवणे थांबवले नाही तर जे काही मोजके कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहिले आहेत तेदेखील निघून जातील. त्याच्याकडे फक्त ‘हम दो हमारे दो’ असेल असेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांची सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती केल्याबद्दल ते स्पायडर मॅन असल्याचे वक्तव्य केले होते त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना बावनकुळे म्हणाले की, उपमुख्यमंत्री केवळ सहा नव्हे तर आठ जिल्ह्यांचा कारभारही सांभाळू शकतात. फडणवीस यांची क्षमता पटोलेंना माहिती नाही.
छगन भुजबळांनी ज्या पद्धतीने शाळांमध्ये देवी सरस्वतीच्या चित्रांच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, ते पहाता भुजबळ हे राष्ट्रवादीचे ओवेसी (एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी) असल्यासारखे वाटतात, अशी टिप्पणीही बावनकुळे यांनी केली.