नवी दिल्ली – महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये मनमानी कारभार सुरु असून राष्ट्रपती राजवट का लागू करण्यात येऊ नये, असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी नारायण राणे यांनी केली. मुख्यमंत्रीच सचिन वाझेंचे गॉडफादर आहेत. या सर्व प्रकरणाला मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत. त्यांना एक दिवसही खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही, असा टोलाही त्यांनी लागविला.
सध्या राज्यात सचिन वाझे प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहेत. या प्रकरणामुळेच मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली. आता यावरुन भाजप नेते नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘उद्धव ठाकरे सचिन वाझेंचे गॉडफादर आहेत. या सर्व प्रकरणाला मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत. त्यांना एक दिवसही खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही’, अशी टीका त्यांनी केली आहे.
राणे म्हणाले, सचिन वाझे आधी निलंबित होते. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना डिपार्टमेंटमध्ये परत घेतले. परत घेतल्यानंतर थेट त्यांच्याकडे क्राईम इंटेलिजन्स यूनिटची जबाबदारीही दिली. केवळ मुख्यमंत्र्यांमुळेच वाझे पोलीस दलात परत आले. यावरून मुख्यमंत्री हेच वाझेंचे गॉडफादर असल्याचे दिसून येते, असे ते म्हणाले.
‘मुख्यमंत्र्यांनी वाझेंकडून सर्व कामे करून घेतली. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुखांच्या आधी मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा द्यावा. सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियन, पूजा चव्हाण आणि मनसुख हिरेन यांच्या हत्या झाल्या. यातील बहुतेक प्रकरणे वाझेंकडे देण्यात आली होती. संबंध नसतानाही वाझेंकडे ही प्रकरणे का दिली?’ असा सवालही यावेळी राणेंनी उपस्थित केला.