गुवाहाटी – शिवसेनेच्या बंडखोरांनी आसामच्या गुवाहाटी येथे तळ ठोकला असतानाच आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांनीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सुटी घालवण्यासाठी आसामला येण्याचा सल्ला दिला आहे. आपण देशातल्या सगळ्याच आमदारांना येथे येण्याचे आमंत्रण देतो असेही त्यांनी म्हटले आहे.
जर आमदार (महाराष्ट्रातील बंडखोर) अजुन काही दिवस येथे राहीले तर माझ्यासाठी ते चांगलेच आहे. मी ठाकरे यांनाही येथे येण्याचे आमंत्रण देतो. संबंधित आमदारांना येथे हॉटेलमध्ये ठेवून संघराज्याच्या चौकटीचे उल्लंघन झाल्याचा आरोप विरोधक करत असल्याकडे सरमा यांचे लक्ष वेधण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, यात चौकटीचे उल्लंघन होण्याचा प्रश्नच कुठे येतो.
जर लोक आसामला आले तर मी हॉटेल्स बंद करायचेत का, असा सवाल त्यांनी केला. जर उद्या कोणी गुवाहाटी येथे येऊन दहा दिवस हॉटेलमध्ये राहायचे ठरवले तर तुम्ही येऊ नका, असे मी त्यांना सांगायचे का? पर्यटन विभागावर आम्ही प्रचंड पैसा खर्च केला आहे. कामाख्यला भेट द्या, काझीरंगाला भेट देण्यासाठी आपण बोलावतो आणि त्यांनाच म्हणजे पर्यटकांना रोखायचे का, अशी विचारणा त्यांनी केली.
महाराष्ट्रातील आमदारांना ओलीस ठेवल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. ते लोक हॉटेलमध्ये उतरले आहेत. ते आनंदात आहेत. ते आमचे पाहुणे आहेत आणि त्यांना काही अडचण नाही ना, हे पाहण्यासाठी आपण सामान्यत: भेटी देत असतो अशी टिप्पणी त्यांनी केली.