पुणे – भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पार्टनरचे कसाबशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप सोमय्या यांनी केला आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. सोमय्या यांच्या या नवीन आरोपानंतर राजकीय क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांचा मुंबई हल्ल्यातील आरोपी व दहशतवादी अजमल कसाबसोबत संबंध असल्याचा आरोप बरोबर मुंबईतील 26/11 हल्ल्यात पोलिस अधिकाऱ्यांनी वापरलेले बुलेटप्रूफ जॅकेट बोगस असल्याचाही गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
किरीट सोमय्या म्हणाले, शरद पवार यांच्या पक्षातील नवाब मलिक हे दाऊचे पार्टनर आहे तर उद्धव ठाकरे यांची कसाबशी व्यावासायिक संबधं. मी जाणीवपूर्वक सांगू शकतो की नवाब मलिक यांचे संबंध दाऊद गॅंगपर्यंत पोहचू शकतात तर उद्धव ठाकरे यांच्या पार्टनरचे संबंध कसाब पर्यंत आहेत. हेमंत करकरेंना देण्यात आलेले बुलेटप्रूफ जॅकेट हे बोगस होते त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हे जॅकेट बिमल अग्रवाल यांनी पुरवले होते. यशवंत जाधव यांच्यावर ज्यावेळी धाड टाकण्यात आली त्यावेळी बिमल अग्रवाल यांचे नाव पुढे आले होते.
बिमलकुमार रामगोपाल अग्रवाल यांची तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अटक होऊन ते सध्या जामिनावर आहेत. बिमलकुमार अग्रवाल, किशोरकुमार अग्रवाल आणि यतिन यशवंत जाधव. समर्थ इरेक्टर डेव्हलेपर्स ही बिमल अग्रवाल आणि यशवंत जाधव यांची भागीदारीमधील कंपनी आहे. या कंपनीने बद्री प्राईव्हेट लिमिटेड कंपनीकडून काही महिन्यांपूर्वी मलबार हिल येथे रि डेव्हलपमेंट प्रोजेक्ट 80 कोटी रुपयांना विकत घेतला. यशवंत जाधव यांची कथा 1 हजार कोटींपर्यंत जाणार आहे. समर्थ डेव्हलेपर्स यांचे संबंध उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यासोबत आहेत. श्रीधर पाटणकर यांनी बुलेटप्रूफ जॅकेट घोटाळा करणाऱ्या बिमल अग्रवालकडून टीडीआर घेतला आहे. असे सोमय्या म्हणाले.