मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंडखोरी करत सत्तांतर घडवून आणले. दरम्यान, महाविकास आघाडीमधून बाहेर पडलेल्या या बंडखोर आमदारांनी महिन्याभरामध्ये अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर सडकून टीका केली. शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवून शिवसेना संपवण्याचा डाव आखला आहे, असा आरोप केला आहे. आता याच आरोपांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे विधान केले आहे. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे.त्याचा आज दुसरा भाग प्रसारित झाला त्यात त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
उद्धव ठाकरेंनी बंडखोरांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याच्या मुद्द्यावरुन टीका केली. “आधी भाजपासोबत युतीत होतो तर भाजपा त्रास देतेय. भाजपा त्रास देत होती शिवसेनेला खोटं ठरवत होती. आपल्यासोबत ठरवलेल्या गोष्टीला नकार होता म्हणून महाविकास आघाडीला जन्म दिला तर काँग्रेस, राष्ट्रवादीवाले त्रास देत आहेत म्हणायला लागले, मग नेमकं तुम्हाला हवं तरी काय?” असा प्रश्न उद्धव यांनीच विचारला.
उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना सत्तेची चटक लागल्याची टीका केली. “त्यांना लालसा आहे. त्यांना स्वत:ला मुख्यमंत्रीपद हवं होतं. ते त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने मिळवलं. ही आमची शिवसेना म्हणत शिवसेनाप्रमुखांबरोबर तुलना करु लागले,” असं म्हणाले. यावर राऊत यांनी, “शिवसेनाप्रमुखांशी कधी तुम्ही सुद्धा तुलना केलेली नाही,” अशी प्रतिक्रिया नोंदवली. “त्यांनी केली पण हे पाहिल्यानंतर मला नाही वाटतं भाजपा कधी पुढे त्यांना स्वत:च्या पक्षात घेतील. नाहीतर ते पुढे कधीतरी नरेंद्रभाईंबरोबर तुलना करायला लागतील स्वत:ची आणि पंतप्रधान पद मागतील,” असा खोचक टोला उद्धव यांनी लगावला.
“लालसा फार घाणेरडी गोष्ट असते. त्याला आपण चटक म्हणू शकतो. मला एका गोष्टीचं समाधान नक्कीच आहे मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो पण मला सत्तेची चटक नाही लागली. सत्तापिपासूपणा एकदा का रक्तात भिनला की तुम्ही कोणाचे नसता आणि कोणी तुमचं नसतं. तेच त्यांचं झालेलं आहे,” अशा शब्दांमध्ये उद्धव यांनी टीका केली.
शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर, सांगोल्याचे शहाजीबापू पाटील यांच्यासहीत रामदास कदम यांच्यासारख्या अनेक आजी-माजी नेत्यांनी निधीचा मुद्दा उपस्थित करण्याबरोबरच शरद पवारांनी शिवसेना संपवल्याचा आरोप केला होता. या आरोपांना उद्धव यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे. “फुटीरांचा असा एक आक्षेप आहे शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करुन शिवसेना संपवली,” असा प्रश्न संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. त्यावर उद्धव यांनी, “मग आता जे गावोगावी दिसतंय ते काय आहे?” असा प्रश्न विचारला.
“आमदार गेले आणि आता काही खासदार गेले,” असे म्हणत राऊत यांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावर उत्तर देताना, “हे गेल्या निवडणुकीमध्ये पडले असते तर काय झालं असतं. हे गेल्या निवडणुकीत पडले असते ते अडीच वर्षांनी पडले असं मी समजतो,” असं माजी मुख्यमंत्री म्हणाले.