मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणीचे आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. यामुळे महाविकास आघाडीचे सरकार आपोआपच पडले. परंतु, उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हवेळी राजीनामा न देता सभागृहात येऊन बोलले पाहिजे होते. त्यांनी लढण्याची ताकदच ठेवली नाही, अशा शब्दांत कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली.
काळजीवाहू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करून राजीनामा देण्याची घोषणा केली होती. या निर्णयावर कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी निशाणा साधला.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होता, तो संभ्रम अवस्थेत आहे. पक्षांतर बंदी कायदा, बहुमत चाचणी याबद्दल न्यायालयाने स्पष्ट असा निकाल दिला नाही. मुळात उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनामध्ये यायला पाहिजे होते. त्यांनी आपली बाजू मांडायला हवी होती. अधिवेशनात भाषण करून राजीनामा दिला असता तरी चालले असते. पण त्यांनी अधिवेशनात बोलण्याची संधी गमावली आहे.
सभागृहामध्ये महाविकास आघाडी सरकार का स्थापन झाले याबद्दल बोलताही आले असते. विरोधी पक्षालाही त्यांचे मत मांडता आले असते. पण उद्धव ठाकरे यांनी लढण्याची ताकदच ठेवली नाही. एकदा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला तर विषय वेगळा होता, असे ते म्हणाले.
त्यांनी फेसबुक लाईव्ह करायला नको हवे होते. सभागृहामध्ये जर बोलले असते तर त्यांचं भाषण हे रेकॉर्डवर राहिले असते. महाराष्ट्रातील जनतेनेही ऐकले असते’ असे मतही त्यांनी व्यक्त केले.
पवारांनी सर्व व्यवस्था केली होती
खरं म्हणजे, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री केले होते. तसे घडेल अशी अपेक्षा त्यांना होती. संधी मिळेल तर आपल्याला मिळेल अशी एकनाथ शिंदेंना होती. पण शरद पवार यांनी सर्व व्यवस्था केली होती. जर आदित्य ठाकरे यांचे नाव आले असतें तर कमी वयाच्या व्यक्तिच्या हाताखाली काम करण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री होण्यास सांगितले, असा खुलासाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.