मुंबई: राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित येत सत्ता स्थापन केली असून, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीवेळी मनसेप्रमुख राज ठाकरेंनी राज्याला मजबूत विरोधी पक्ष मिळावा असं म्हटलं होतं. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भावाचं ते स्वप्न पूर्ण केलं, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
राज ठाकरेंना मजबूत विरोधी पक्ष हवा होता. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भावाची मागणी पूर्ण केली, असे म्हणत भुजबळांनी फडणवीसांना कोपरखळी मारली आहे.
आज विधानसभा पदासाठी नाना पटोलेंची बिन विरोध निवड झाली आहे. तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी छगन भुजबळांनी जोरदार टोलेबाजी केलेली पाहायला मिळाली. आम्ही विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. सरकारला १६९ आमदारांचा पाठिंबा दिला आहे. विरोधी पक्षानं ही गोष्ट लक्षात घ्यावी. आता विरोधकांनी आम्हाला काम करण्याची संधी द्यावी. त्यासाठी रात्रीचे खेळ बंद झाले तर बरं होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी फडणवीसांना कोपरखळी मारली आहे.
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, सत्ता असताना काहींनी माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मला राग नाही. माझा आवाज त्यामुळे कमी होणार नाही. सभागृहात असतो, तितकाच तो बाहेरदेखील असतो.
तसेच मी पुन्हा येईन यावरुनही भुजबळांनी फडणवीसांना टोला लगावला. आपण परत आलात. तुम्ही शब्द खरा करुन दाखवलात. विरोधी पक्षनेते हे मोठं पद आहे. तुमच्याकडे मंत्रिपदाचा दर्जा आहे. विरोधी पक्षनेत्याला अनेकांना अंगावर घ्यावं लागतं. नंतर त्याचा त्रास होतो. मात्र त्याशिवाय जनतेला न्याय देता येत नाही, याची मला जाणीवआहे. मी त्या पदावर काम केलं आहे, असंही भुजबळ म्हणाले.