मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर ‘रत्नागिरी राजापूर रिफायनरी’ सारखा प्रकल्प हातातून गमावणं ना कोकणाला परवडेल ना महाराष्ट्राला असे त्यांनी सांगितले आहे. राज्याचे दीर्घकालीन हित लक्षात घेऊन ह्या प्रकल्पाच्या बाबतीत सरकारने सामंज्यस्याची भूमिका घ्यावी असंही त्यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे.
राज ठाकरेंच्या या आवाहनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कसा प्रतिसाद देतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. यातच आता उद्धव ठाकरे यांनी देखील नाणारबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. या मुद्यावर ते म्हणाले,’त्या ठिकाणी रिफायनरी न करण्याचा निर्णय आधीच झालेला आहे. कारण या प्रकल्पाला तेथील स्थानिकांचा विरोध असल्यामुळेच तेथून प्रकल्प हटविण्यात आला. स्थानिकांचा विरोध असल्यामुळेच आम्ही तेथून प्रकल्प दुसरीकडे हलविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाचे ज्याला स्वागत किंवा विरोध करायचा असेल त्यांनी करावा.
ते पुढे म्हणाले,’रिफायनरीला नाणारऐवजी दुसरी पर्यारी जागा देणार आहे. मात्र, हा प्रकल्प राज्याबाहेर जाऊ देणार नाही.’ अशी भूमिकाही उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे.
दरम्यान, लॉकडाऊननंतर वाढलेल्या बेरोजगारीकडे देखील लक्ष वेधण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी त्यांच्या या पत्राच्या माध्यमातून केला होता. सरकारने नाणार रिफायनरी संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली तर संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देखील राज ठाकरेंनी सरकारला दिले होते.