जालना – जालना येथे दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विविध विकासकामांचा शुभारंभ केला. ज्याच्यावरती माझं घर चालतय तो शेतकरी संकटात आहे. अंबाबाईला प्रार्थना केली, लवकरात लवकर दुष्काळ संपू दे. अजून पावसाळा सुरू झालेला नाही. पाऊस पडला तर लगेच चारा उपलब्ध होणार नाही म्हणून ही मदत आहे, असे ते म्हणाले.
खैरेंचा नव्हे, तर तो माझाही पराभव
औरंगाबाद लोकसभेमध्ये झालेला पराभव फक्त चंद्रकांत खैरे यांचा झालेला नाही. तर तो माझा म्हणजे उद्धव ठाकरेंचा पराभव आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पण आम्ही पराभवाने शांत बसणारे नाहीत. आम्ही पुन्हा एकदा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. चंद्रकांत खैरे तुम्ही काळजी करू नका, पुढचा विजय आपला आहे, असा विश्वास त्यांनी खैरे यांना यावेळी दिला.
उद्धव ठाकरे यांचे आज सकाळी जालन्यात आगमन झाले. मराठवाडा दौऱ्यात अर्जुन खोतकर यांच्या घरी चहापान केले. त्यानंतर त्यांच्या हस्ते पाण्याच्या टॅंकर आणि रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठवाड्यात दुष्काळ संपेपर्यंत मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी असू असे वचन देतो, असेही ते म्हणाले. तसेच कर्जासाठी ज्या बॅंका शेतकऱ्यांची अडवणूक करत असतील त्यांना कोणत्याही मार्गाने सरळ करा हे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. आता जर त्यांनी काही नाही केले तर शिवसेना आपल्या पद्धतीने पाहून घेईल, असेही ठाकरे म्हणाले. जो शेतकऱ्यांना आडवेल त्याला शिवसैनिक सरळ करेल, असे ते म्हणाले.