मुंबई – लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील सुमारे 2 हजार विद्यार्थी राजस्थानच्या कोटामध्ये अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात आणण्याच्या मुद्द्यावर उद्धव यांनी गेहलोत यांच्याशी तपशीलवार चर्चा केली. करोनाचा फैलाव रोखण्यासाठीच्या उपायांच्या माहितीचीही चर्चेत देवाणघेवाण झाली, असे सूत्रांनी सांगितले.
स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे केंद्र बनलेल्या कोटामध्ये देशभरातील विद्यार्थी शिक्षण घेतात. लॉकडाऊनमुळे तिथे अडकून पडलेल्या आपल्या विद्यार्थ्यांना काही राज्यांनी परत नेले. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या परतण्याचीही व्यवस्था करण्याच्या मागणीने त्यामुळे जोर धरला आहे. माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही ती मागणी लावून धरताना उद्धव यांना त्यासंबंधीचे पत्र पाठवले. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्याच्या हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील सरकारमध्ये कॉंग्रेस सहभागी आहे. तर, राजस्थानातही कॉंग्रेसचीच सत्ता आहे. त्यामुळे कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना लवकरच दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.