पुणे – भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांनी महाविकास आघाडी स्थापन केली. मात्र या आघाडीत अधुनमधून धुसपूस सुरूच असल्याचं चित्र आहे. काँग्रेसचे नाना पटोले स्वबळाचा नारा देताना दिसता आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी थेट शिवसेनेवर हल्लाबोल करत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना टोला लगावला आहे.
खासदार कोल्हे म्हणाले की, शरद पवार साहेबांचा वरदहस्त डोक्यावर आहे, म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे याचा विचार श्रेयासाठी धडपड करणाऱ्यांनी करावा. माजी खासदारांना काही काम नसल्यामुळे वाद,भांडणे लावण्याचे व श्रेय घेण्याचे काम ते करत आहे.
खासदार कोल्हेंच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा धुसफूस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. खेड बाह्यवळण रस्त्याचे उद्घाटन कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
सविस्तर वृत्त असं की, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी या रस्त्याच्या कामासाठी प्रयत्न केले होते. मात्र रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या पत्रिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा माजी खासदार आढळराव पाटील यांचा फोटो नव्हता. त्यामुळे शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले.
दरम्यान संतप्त झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांसह आढळराव पाटील यांनी शुक्रवारीच खेड आणि नारायणगाव रस्त्याचे उद्घाटन केले. यावरून अमोल कोल्हे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.