नागपूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मात्र या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. “शिवसेना-भाजपचे नेते भेटतात, त्यात काही चुकीचं नाही. राजकारणापलीकडे वैयक्तिक संबंध जपण्याचे संस्कार माझ्यावर झाले आहेत. शिवसेना-भाजपचे नेते भेटले की लगेच युती व्हायला ती काही इन्स्टंट कॉफी नाही आणि अशा घटनांवर तातडीने प्रतिक्रिया द्यायला माझं आयुष्य काही ब्रेकिंग न्यूज नाही”, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
नागपूरात एका कार्यक्रमासाठी सुप्रिया सुळे आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ठाकरे-फडणवीस भेटीची मला माहिती नाही. सर्व पक्षाचे नेते निवडणुका सोडून आपले वैयक्तिक संबंध चांगले ठेवत असतील तर त्याचं मनापासून स्वागत करायला हवं. माझ्यावर यशवंतराव चव्हाणाचे संस्कार झाले आहेत. त्यांचे सर्वांशी वैयक्तिक संबंध चांगले होते. राजकीय मतभेद एका ठिकाणी आणि वैयक्तिक नाती एका ठिकाणी यात काही गैर नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी ईडीची चौकशी आमच्यासाठी चांगलीच आहे. कारण ईडीचा राष्ट्रवादीला नेहमी फायदाच झाला आहे, असा उपरोधिक टोला लगावला.
महाविकास आघाडी सरकार भक्कम असून जनतेच्या मनामनात या सरकारनं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे कुणी किती प्रयत्न केले किंवा राजकीय डावपेच आखले तरी त्याचा काही फायदा होणार नाही. कारण केवळ ५ वर्षे नव्हे, तर महाविकास आघाडी सरकार राज्यात पुढची २५ वर्ष काम करणार आहे, असा विश्वास देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केला.