मुंबई – सामनासाठी दिलेल्या मुलाखतीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अनेक गोष्टीबाबतचा खुलासा केला आहे. तसेच शिवसेनेचा पुन्हा मुख्यमंत्री होईल असं देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी ठणकावून सांगितले. तसेच माझं शिवसेना प्रमुखांना जे वचन आहे ते आजही कायम असल्याचे ठाकरेंनी यावेळी सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतुन बंडखोरी करत काही आमदारांसह वेगळा गट केला आणि भाजपच्या पाठींब्यावर राज्यात सरकार स्थापन केलं. यावेळी शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रेला सुरवात केली.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सर्व घडामोडींवर तितक्या स्पष्टपणे अद्याप भाष्य केलेलं नव्हतं. त्यामुळे संजय राऊत यांनी सामनासाठी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेत त्यांना विविध विषयावर बोलत केल्याचे पाहायला मिळालं. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी बंडखोरांसह भाजपवर देखील निशाणा साधत विविध प्रश्नांची उत्तरे दिली.
बंडखोरी करून आमदार निघून गेल्यानंतर तुमची मुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी होती का ? असा सवाल ठाकरेंना यावेळी विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले, “माझी मुख्यमंत्री पद स्वीकारण्याची तयारी नव्हती, पण त्या काळात मी ते जिद्देने केले, मी इच्छेने मुख्यमंत्री नाही झालो जिद्दीवर झालो” असल्याचे देखील यावेळी ठाकरेंनी स्पष्ट सांगितले.