मुंबई : राज्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० एप्रिल पर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढावा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र वेगवेगळ्या राज्यात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता राज्याचे मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या संपर्कात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्याचे मुख्य सचिव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. यावेळी वाढती रुग्ण संख्या पाहता राज्यात ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ पंजाब आणि ओडिसा राज्यानेदेखील १ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची विनंती केली आहे. देशात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सकाळी ११ वाजेपासून देशातील सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान संवाद साधत आहे.
दरम्यान, करोनाचा प्रसार देशात झपाट्याने वाढतच असून अवघ्या चोवीस तासात देशभरात करोनामुळे 40 जणांचा बळी गेला आहे. तर तब्बल 1 हजार 035 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांचा एकुण आकडा 7 हजार 447 वर पोहचला आहे.