मुंबई – भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव सुरु आहे. हिंमत असेल तर भाजपने मध्यावधी निवडणुका घ्याव्यात, असे थेट आव्हान माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले.
शिवसेना भवनात आज राज्यातील जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीत ते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा आणि विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या उद्धव ठाकरे यांनी पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रित केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव सुरु आहे. आपण जनतेच्या न्यायालयात जाऊ, जर चुकत असेल, तर जनता आम्हाला घरी बसवेल. तुम्ही चुकत असाल, तर जनता तुम्हाला घरी बसवेल. हिंमत असेल तर भाजपने मध्यावधी निवडणुका घ्याव्यात.
तसेच विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे या घटनेचा अपमान आहे. सध्या जे सुरु आहे ते घटनेला धरून सुरु आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडण्याचा प्रकार सुरु आहे, त्याबाबत भाजपने आपली भूमिका स्पष्ट मांडावी. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याबाबत सर्वाना सत्य बोलू द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.