मुंबई – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर राज्यभर त्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला गेला. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील शिवरायांचा अपमान करणारी विधान करायला कोश्यारींना लाज वाटत नाही का? असा सवाल उपस्थित केला आहे. नुकतीच पुण्यात पत्रकार परिषद घेत उदयनराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.
यावेळी ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. मेलो असतो तर बर झालं असतं. अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांच्या वाक्याचा संदर्भ घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यापालांच्या राजीनाम्याविषयी सूचक वक्तव्य केले आहे.
यावेळी फडणवीस म्हणाले की, “छत्रपती घराण्याचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाहीत. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्या आहेत. राज्यपाल हे संविधानिक पद आहे. यात सरकार काही हस्तक्षेप करू शकत नाही. राज्यपालांना पदमुक्त करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत;. असं ते म्हणाले आहेत.
उदयनराजे भोसले नेमकं काय? म्हणाले…
पुण्यात पत्रकार परिषदेत उदयनराजे भोसले म्हणाले, “शाहू, फुले, नाना पाटील, बाबासाहेब असतील, यांचे स्फूर्ती स्थान महाराज होते आणि हे म्हणतात महाराजांचे विचार जुने झाले. मग आजपर्यंत कोणामुळे पुढे वाटचाल झाली असा सवाल देखील उदयनराजेंनी यावेळी विचारला.
त्या त्रिवेदी यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे या लोकांना लाज वाटत नाही? कोण आहेत ही लोकं शिवाजी महाराज यांचे विचार सोडून चालणार नाही नाहीतर देशाचे तुकडे होतील असं स्पष्ट मत यावेळी उदयन राजेंनी व्यक्त केलं.
मी कोष्यारी यांच्या विरोधात नाही पण अशा प्रवृत्तीच्या विरोधात आहे. असच चालू राहिले तर विकृती होईल. शिवाजी महाराज कुठल्या पक्षाचे नव्हते. मी आज परिवाराचा सदस्य म्हणून बोलतो आहे पक्ष वगेरे नंतर बघू.
मी राष्ट्रपती आणि नरेंद्र मोदी यांची लवकरच भेट घेणार असल्याचे देखील उदयनराजेंनी यावेळी सांगितले. तसेच पुढच्या वाटचालीबाबत भाष्य करणार असल्याचे देखील उदयनराजेंनी यावेळी सांगितले.