सातारा – बेधडक विधानांनी संभ्रम तयार करून भावनेच्या लाटांवर स्वार होण्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचे दबावतंत्र सध्या यशस्वी होताना दिसत आहे. मुख्यमंत्री वगळून भाजपच्या इतर नेत्यांना टीकेच्या रडारवर घेत उदयनराजे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेची संभ्रमित कोंडी केली आहे.
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या भेटींमध्ये दोघांनीही खासदार उदयनराजे भोसले यांचा मन वळविण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्ष सर्वसामान्यांच्या हितासाठी सक्षम असावा लागतो. त्याकरिता उदयनराजे यांनी भाजपमध्ये जाऊ नये, अशी गळ शेट्टी यांनी बुधवारी उदयनराजे यांना शासकीय विश्रामगृहात घातली. मात्र, माझे अजून काही ठरले नाही, असे सांगत उदयनराजे यांनी भाजप प्रवेशाचा विषय थांबवला. साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात शरद पवारांचा राजकीय एकाकीपणा व उदयनराजे यांचा संभाव्य भाजप प्रवेश या दोन गोष्टींचीच चर्चा आहे.
“अनप्रेडिक्टेबल’ या शब्दात उदयनराजेंच्या राजकारणाचे वर्णन करावे लागेल. मावळा छत्रपतींचे मन वळवू शकत नाही, असे विधान करत खासदार अमोल कोल्हे यांनी राजेंच्या भाजप प्रवेशाला बळकटी दिली होती. मात्र, उदयनराजे यांनी माझे भाजप प्रवेशाचे अजून काही ठरले नाही असे उत्तर राजू शेट्टी यांना देत भाजप प्रवेशाबाबात संभ्रम निर्माण केला. त्यांच्या परस्परविरोधी देहबोलीने राजे समर्थक तूर्त तरी संभ्रमित आहेत. भाजप प्रवेशाच्या विलंबावर दिलीश्वरांची नाराजी असे एक कारण दिले जात आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कोल्हापूरातून थेट साताऱ्यात सरकू नये, यासाठी भाजपकडून “वेट अँड वॉच’चे राजकारण सुरू असल्याचा राजे समर्थकांचा संशय बळावू लागला आहे.
भाजपमधील प्रवेशाचा कोटा पूर्ण झाला आहे तर पोटनिवडणुकीसह उदयनराजे यांना निर्धोक पुनर्वसन हवं आहे. आधी मुख्यमंत्र्यांची भेट मग सोलापूरच्या मेगा भरतीपेक्षा दिल्ली येथे भाजप प्रवेशाचा मुहूर्त नंतर राजे रामर्थकांचा मेळावा व निर्णयाचे अंतिम अधिकार उदयनराजे यांना या घटनांमध्ये एक गोष्ट ठळकपणे दिसते ती म्हणजे दबावतंत्राची. त्यानंतर “माझ्या प्रवेशाला मीच खो घालू शकतो,’ पासून “मला राजकारणातून विरक्त व्हावेसे वाटते,’ या बेधडक विधानापर्यंत भाजपच्या तंबूतही राजेंनी गोंधळ उडवून दिला आहे. राजे थेट शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या वृत्ताने भाजपचीही कोंडी झाली आहे. खासदारकीची पोटनिवडणूक विधानसभेबरोबर घेतली जावी, शाही भाजप प्रवेश या दोन मद्द्यांबाबत भाजपच्या वरिष्ठांकडून पंधरवड्यानंतरही अनुकूल निरोप न आल्याने उदयनराजे यांचे राजकीय अडथळे वाढल्याचे मानले जात आहेत.