मुंबई – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर राज्यभर त्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला गेला. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील शिवरायांचा अपमान करणारी विधान करायला कोश्यारींना लाज वाटत नाही का? असा सवाल उपस्थित केला आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेत उदयनराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.
यावेळी ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. “मेलो असतो तर बर झालं असतं’. अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “उदयनराजे भोसले यांचे अश्रू आम्ही पाहीले आहेत, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनात ही भावना आहे’ असं ते म्हणाले आहेत.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “उदयनराजे भोसले यांचे अश्रू आम्ही पाहीले आहेत, ते छत्रपतींचे वंशज आहेत. उदयनराजेंचे जे अश्रू आहेत ते महाराष्ट्राचे अश्रू आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनात ही भावना आहे, की शिवरायांचा हा अपमान सहन करण्यापेक्षा मरण का नाही आलं, ही त्यांनी महाराष्ट्राची भावना व्यक्त केली आहे’ असं संजय राऊत म्हणाले.
पत्रकार परिषदेदरम्यान उदयनराजे नेमकं काय म्हणाले….
पुण्यात पत्रकार परिषदेत उदयनराजे भोसले म्हणाले, “शाहू, फुले, नाना पाटील, बाबासाहेब असतील, यांचे स्फूर्ती स्थान महाराज होते आणि हे म्हणतात महाराजांचे विचार जुने झाले. मग आजपर्यंत कोणामुळे पुढे वाटचाल झाली असा सवाल देखील उदयनराजेंनी यावेळी विचारला.
त्या त्रिवेदी यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे या लोकांना लाज वाटत नाही? कोण आहेत ही लोकं शिवाजी महाराज यांचे विचार सोडून चालणार नाही नाहीतर देशाचे तुकडे होतील असं स्पष्ट मत यावेळी उदयन राजेंनी व्यक्त केलं.
मी कोष्यारी यांच्या विरोधात नाही पण अशा प्रवृत्तीच्या विरोधात आहे. असच चालू राहिले तर विकृती होईल. शिवाजी महाराज कुठल्या पक्षाचे नव्हते. मी आज परिवाराचा सदस्य म्हणून बोलतो आहे पक्ष वगेरे नंतर बघू.
मी राष्ट्रपती आणि नरेंद्र मोदी यांची लवकरच भेट घेणार असल्याचे देखील उदयनराजेंनी यावेळी सांगितले. तसेच पुढच्या वाटचालीबाबत भाष्य करणार असल्याचे देखील उदयनराजेंनी यावेळी सांगितले.