मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकीय पक्षातील नेत्यांनी महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधाने केली आहेत. अलीकडेच विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, तर ते स्वराज्यरक्षक होते, असे अजित पवारांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानानंतर भाजपसह शिंदे गटातील नेत्यांनी यावर आक्षेप घेत वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने केली होती. त्यानंतर आता या वादात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उदयनराजे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, ‘छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आणि धर्मवीरही होते,’ असे विधान उदयनराजे यांनी केले. शिवाय त्या काळात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी अनेक मशिदी आणि मंदिरं बांधली. साताऱ्यातील शाही मशिदीची देखरेख आमच्या कुटुंबाकडून केली जाते, असे विधान उदयनराजे यांनी केले.
महापुरुषांवरून सुरू असलेल्या वादावर भाष्य करताना उदयनराजे म्हणाले, “सर्व धर्म समभाव ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडली होती. त्यांनी कुठल्याही जाती-धर्मातील लोकांसोबत भेदभाव केला नाही. प्रत्येक राजकीय पार्टी आपापल्या सोयीने बोलत असते. पण शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांनी कधीही कुठल्या धर्माचा अनादर केला नाही. त्यांनी त्या काळात अनेक मशिदी आणि मंदिरं बांधली.
तसेच साताऱ्यात शाही मशीद आहे. त्याची संपूर्ण देखरेख आमच्या कुटुंबाकडून होते. त्यामुळे यावरून कुठलाही वाद करू नये. कारण दोघंही स्वराज्यरक्षक होते, त्यांनी सगळ्या धर्माचा आदर केला म्हणून ते धर्मरक्षकही होते,” अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली.