मुंबई – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर राज्यभर त्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला गेला. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील शिवरायांचा अपमान करणारी विधान करायला कोश्यारींना लाज वाटत नाही का? असा सवाल उपस्थित केला आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेत उदयनराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. यावेळी ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. “मेलो असतो तर बर झालं असतं’. अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली होती.
दरम्यान, आपल्या मनातील याच वेदना मांडण्यासाठी आज उदयनराजे रायगडावर दाखल झाले आहेत. छत्रपतींच्या समाधीजवळ जाऊन आम्ही वेदना मांडणार असून आत्मक्लेष करणार आहोत, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले. यावेळी राजगडावरून बोलताना त्यांनी भाजपाच्या नेत्यांवर आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचावर जोरदार हल्लाबोल केला असल्याचं पाहायला मिळालं.
यावेळी उदयनराजे म्हणाले, “कुठल्याही प्रकारचे राजकारण येऊ देऊ नका, आपलं कोणतंही स्वार्थ नाही. यापुढे शिवरायांचा अवमान करूनच दाखवावा, काय होईल त्यावेळेस आपआपल्या परीने पाहून घेऊ. अवमान करणाऱ्यांना वेळ दाखवण्याची वेळ आली आहे. मन आज व्यथित झालं आहे. दुखीत झालं आहे. काय वेळ आलीये? महाराजांचा जयघोष करण्यासाठी आलो असतो, तर वेगळा आनंद झाला असता. पण आपण काय करतोय? शिवसन्मानाचा निर्धार करण्याची वेळ आपल्यावर आलीये. असं ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना उदयराजे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. “ज्यांनी सर्वधर्माचा आदर करण्याचा संदेश महाराजांनी दिला. त्याच व्यक्तीचा राज्यात विटंबना होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा नावाचा वापर सोईनुसार केला असून सोईप्रमाणे इतिहास सांगितला जातो, चित्रपट, लेखक अशा सर्वच ठिकाणी इतिहासाची मोडतोड केली जात आहे, राज्यपाल इथे असते तर टकमक टोकावरून फेकून दिलं असतं’. असेही उदयनराजे यांनी म्हंटले आहे.