मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. संभाजीराजे भोसले २६ फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणासाठी बसणार आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देऊन त्यामध्ये राज्यातील मराठा समन्वयकांनीही सहभागी होण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान या आंदोलनावर उदयनराजे भोसले यांनी नाराजी जाहीर केली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार छत्रपती संभाजीराजे हे २६ तारखेला उपोषणास बसणार असून मराठा आरक्षण मुद्द्यावर न बोललेलं बरं असं सांगत उदयनराजेंनी नाराजी व्यक्त केली आहे. “सगळीकडे राजकारण आणणार असाल तर बोलून बोलून तोंडाची चव गेली,” असे उदयनराजे म्हणाले.
महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुरु असलेल्या कारवाईसंबंधी बोलताना सांगितलं की, “हे कर्म आहे, याच जन्मात परतफेड करावी लागते. याचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. जर तथ्य नसतं तर ते झालं नसतं”.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “अनेक गोष्टी मी उघडपणे बोललो असून राजकारण म्हणून बोललो नाहीत. याचा परिमाण मतदार, सर्वसामान्यावंर किती होतो याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे. आज लोकांचा राजकारण्यांवरील विश्वासच उडाला आहे. लोक जेव्हा पाहतात तेव्हा डोळ्यांमध्ये आत्मीयता असायला हवी पण ती आता कमी होत चालली आहे”.