महामार्गाची दुरुस्ती करा अन्यथा टोलवसुली बंद करू
सातारा – सातारा-पुणे रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून अप्रगत भागातील कच्च्या रस्त्यांसारखी अवस्था महामार्गाची झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शारीरिक आणि आर्थिक नुकसान होत आहे.
त्यामुळे नागरिकांमधून होत असलेला उठाव समर्थनीय आहे. रिलायन्स कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नोव्हेंबरअखेरीस रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा 1 डिसेंबरपासून सातारा-पुणे रस्त्यावरील दोन्ही टोलनाक्यांवर टोलवसुली करू दिली जाणार नाही, असा इशारा माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.
“टोलविरोधी सातारी जनता’ या समूहाने टोलवसुलीविरोधात संघर्ष सुरू केला आहे. “आधी रस्ते दुरुस्त करा, सर्व सुविधा द्या, तोपर्यंत सातारा-पुणे रस्यावरील दोन्ही ठिकाणची टोलवसुली बंद करा’, अशी मागणी या समूहाने केली आहे. या समूहाच्यावतीने उदयनराजे भोसले यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर उदयनराजे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांशी “टोलविरोधी सातारी जनता’च्या प्रतिनिधींसमोर चर्चा केली.
सातारा-पुणे रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. काही ठिकाणी उड्डाणपुलांची कामे सुरू असल्याने केलेल्या पर्यायी वळण रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. महामार्गावरील असंख्य खड्डे लवकर लक्षात येत नसल्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे टोलविरोधी सातारी जनतेने सुरू केलेले आंदोलन समर्थनीय आहे. मी स्वत: नितीन गडकरी यांना निवेदने देऊन, विनंत्या करून याबाबत भूमिका मांडली आहे. या रस्त्याची दुरुस्ती 30 नोव्हेंबरपर्यंत करावी अन्यथा 1 डिसेंबरपासून जनतेला बरोबर घेऊन दोन्ही ठिकाणची टोलवसुली बंद करू, असा इशारा उदयनराजेंनी दिला आहे.