मुंबई : राज्यात नुकतीच विधानसभा निवडणुकीसोबत सातारा लोकसभा पोटनिवडणुक पार पडली. यात राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात गेलेल्या उदयनराजे भोसले यांना पराभवाचा जबर धक्का बसला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी जवळपास एक लाखांहून अधिक मताधिक्याने उदयनराजेंचा पराभव केला. दरम्यान, उदनराजेंच्या पराभवानंतर आता कोल्हापूरचे छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
छत्रपती उदयनराजे यांचा पराभव म्हणजे आमचा पराभव आहे. त्यांच्या पराभवाचे आम्हाला मनापासून दु:ख आहे. मात्र सुख-दु:ख पाहण्याची छत्रपती घराण्याची सवय आहे, आजचा पराजय हा उद्याच विजय कसा असेल? याचा छत्रपती उदयनराजे नक्की विचार करत असतील. पद हा एक भाग आहे, मात्र छत्रपतींची पदवी ही महत्वाची असते, रयतेची सेवा करणे ही छत्रपती घराण्याची परंपरा, असं संभाजीराजे म्हणाले. सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
एक तरी कॅबिनेटची मिटिंग ही रायगडावर घ्यावी अशी माझी विनंती यापुढे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना असेल असेही संभाजीराजे म्हणाले. तसेच नवीन आमदारांना विनंती करताना, गावाचा विकास करायचा असेल, तर प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना समजून घ्या, त्यासाठी रायगडावर जाऊन नतमस्तक व्हा, फक्त जयजयकार करून चालणार नाही, असं देखील खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले.