सोलापूर: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कुठल्याही पक्षाला सरकार स्थपन करता न आल्याने अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यानंतर देखील सत्तास्थापनेचा पेच कायम असून हा वाद अधिकच चिघळत चालला असल्याची परिस्थिती आहे. या वादात आता माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उडी घेतली आहे.
राष्ट्रवादीचे नऊ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा खासदार निंबाळकरांनी केला आहे. अनावधानाने जनमताचा अनादर झाल्याचा सांगत त्याला भाजप जबाबाबदार नाही, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुबड्यावर सरकार टिकणार नाही याची जाणीव उद्धव ठाकरे यांना आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये तात्विक वाद आहे, तो लवकरच मिटेल असंही नाईक निंबाळकर म्हणाले.
त्याच बरोबर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभूत झालेले उदयनराजे भोसले यांच्या राजकीय पुनर्वसनाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांना राज्यात महत्वाचे पद किंवा राज्यसभेववर संधी देण्याचं विचाराधीन आहे, सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भावनिक मुद्यामुळे शरद पवार यशस्वी झाल्याचंही निंबाळकर म्हणाले आहेत.
आम्हाला आजही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबद्दल आदर आहे. आम्ही आजही टोकाची विधाने केलेली नाहीत. मला खात्री आहे, भाजप-शिवसेना एकत्र येईल. भाजप मोठ्या भावाची भूमिका पार पडेल, असं विश्वास निंबाळकरांनी व्यक्त केला आहे.