साताऱ्यातील समर्थक मुंबईला रवाना
सातारा – भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील मिळाल्याने माजी खासदार उदयनराजे भोसले राज्यसभेसाठी उद्या, दि. 12 रोजी मुंबईत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी राजे समर्थकही मुंबईला रवाना झाले आहेत.
लोकसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर उदयनराजे हे राजकारणातून तसे बाहेर आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्यास उदयनराजे यांचे राज्यसभेत पुनर्वसन करण्याचे आश्वासन भाजप पक्षश्रेष्ठींनी दिले होते.
दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने उदयनराजेंच्या राज्यसभा खासदारकीबाबत संभ्रम होता. उदयनराजेंना राज्यसभेवर घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रही भूमिका घेतली होती. उदयनराजे हेदेखील गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या दिल्लीतील श्रेष्ठींच्या संपर्कात आहेत. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सात जागांसाठी मतदान होणार आहे. भाजपकडून उदयनराजे व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नावांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे उदयनराजे व आठवले हे उद्या (गुरुवार) विधान भवनात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
त्यामुळे राजे समर्थकांमध्ये चैतन्य पसरले आहे. विधानसभेत भाजपचे संख्याबळ 105 आहे. त्यामुळे भाजपचे दोन खासदार निवडून येण्यात अडचण नाही. मात्र, तिसरा उमेदवार निवडून आणायचा असेल तर भाजपला कसरत करावी लागणार आहे. जमिनीच्या वादातून मुलानेच आई-वडील, बहिणीला संपविले