सातारा (प्रतिनिधी) – माण-खटाव तालुक्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या “गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार’ अर्थात जिहे-कठापूर या महत्त्वाकांक्षी सिंचन योजनेस केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने नुकतेच 537 कोटी रुपये दिले आहेत. ही योजना पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी देण्याचे आश्वासन केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिले. या योजनेच्या पूर्ततेसाठी खा. उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत शेखावत यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.
उदयनराजे म्हणाले, जिहे-कठापूर योजनेमुळे 27500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. माण-खटाव तालुक्यातील 67 गावांचा पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. ही योजना परिसरातील दुष्काळ निवारणास उपयुक्त ठरणार आहे.
याआधी महाराष्ट्रातील अनेक सिंचन प्रकल्पांना केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. काही प्रकल्प निधीअभावी रखडले आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी केंद्राकडून जास्तीत जास्त निधी मिळावा. शिवकालीन तळ्यांच्या पुनर्विकासाबाबत उदयनराजे यांनी शेखावत यांच्याशी चर्चा केली. सातारा जिल्ह्यात 20 गडकिल्ले असून यातल्या अनेक किल्ल्यांवर शिवकालीन तळी अस्तित्वात आहेत.
या तळ्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी शेखावत यांच्याकडे केली. या सर्व किल्ल्यांवरील जलस्रोतांचा अभ्यास करून त्या संदर्भात कोणत्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देता येईल, याची प्रशासकीय पातळीवरू माहिती घेऊन निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
गडकिल्ल्यांवरील जलस्रोत मजबूत करण्यासाठी किल्ल्यांवरील शिवकालीन तळ्यांचा विकास कसा करायचा, ही तळी कशी स्वच्छ करायची याचा अहवाल मागविण्यात येईल. त्यानंतर या प्रकल्पासाठी कोणत्या माध्यमातून निधी देता येईल, याची चाचपणी केली जाईल, असे शेखावत यांनी सांगितले.
कृष्णा नदीच्या शुद्धीकरणासाठी केंद्रीय जल आयोगाच्या माध्यमातून उपाययोजना करता येईल का, याबाबत उदयनराजेंनी शेखावत यांच्याशी चर्चा केली. यासंदर्भात सविस्तर आढावा घेवून पुन्हा चर्चा करण्याचे आश्वासन शेखावत यांनी दिले.