डॉ. भारत पाटणकर; कॉंग्रेस- राष्ट्रवादीला दहा मुद्यांवर पाठिंबा
सातारा – जनतेला तुम्ही म्हणाला होता की हा मोदी कोण? कोण लागून गेला, त्याला घाबरायचे काय काम? आमच्याकडे मोदी पेढेवाला आहे. आता पेढेवाला नाही का? 15 लाख दिले नाहीत, नोटाबंदीने उद्योग बंद पडले. आज सगळे विसरून गेला का? दिलेली वचने तुम्ही न पाळून लाखो लोकांना फसविले आहे. ही शोभणारी गोष्ट नाही. जनता तुम्हाला शिक्षा करेल, अशा शब्दांत श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक व धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर घणाघाती तोफ डागली.
विधानसभा व सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने श्रमिक मुक्ती दलाची भूमिका जाहीर करण्यासाठी आज डॉ. पाटणकर यांनी पत्रकार परिषद घेतली. उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या मुद्यावर त्यांनी सडकून टीका केली. डॉ. पाटणकर म्हणाले, “”आमच्या संघटनेने कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीतील उमेदवारांसाठी दहा मुद्यांवर पाठिंबा दर्शविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप- शिवसेना पक्ष हुकूमशाही पध्दतीने जायीतवादी, धर्मांध, स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना पाठीशी घालणारे आहेत. त्यामुळे त्यांचा पराभव करून जनतेच्या लोकशाहीची अंमलबजावणी करण्यासाठी नवे सरकार निर्माण केले पाहिजे.”
राज्यातील प्रत्येक कुटुंबांची शेती बारमाही बागायत करण्यासाठी समान न्यायाच्या पध्दतीने पाणी दिले पाहिजे. त्यासाठी आटपाडी पॅटर्न सार्वत्रिक केला पाहिजे. प्रकल्पग्रस्तांना जमिनी व त्या जमिनींना पाणी मिळेपर्यंत दरमहा 15 हजार रुपये निर्वाह भत्ता मिळण्यासाठी संघर्षामध्ये सहभागी झाले पाहिजे. कृषी, औद्योगिक क्रांती करण्याचा आणि त्यातून रोजगार निर्मिती करण्याचा उपक्रम महाराष्ट्रात राबवावा.
राज्याची संस्कृती पुढे नेण्यासाठी शिक्षणासह सांस्कृतिक क्षेत्रात मोहिम राबविली पाहिजे. विकास निधी, आमदार फंडातून “श्रमुद’च्या गाव समितीच्या सहमतीप्रमाणेही कामे करावीत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत “श्रमुद’च्या विचाराने उमेदवारांबाबत निर्णय घ्यावा. “श्रमुद’च्या आंदोलनात सहभागी व्हावे. प्रचारामधील फलकांवर “श्रमुद’चे नाव व अध्यक्षांचे छायाचित्र प्रसिध्द करावे. तसेच निवडून आल्यानंतर भाजप, शिवसेनेत जाऊ नये, आदी दहा मुद्यांवर सहमती दर्शवतील त्यांच्या पाठिशी आम्ही राहू, असे पाटणकर यांनी सांगितले. श्रीनिवास पाटील यांनीही ते मान्य केल्यास त्यांच्यासाठीही मेळावे घेवू. ता. दहा ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांच्या निर्णयाची वाट पाहणार आहोत, अशी भूमिका डॉ. पाटणकर यांनी व्यक्त केली. यावेळी डॉ. प्रशांत पन्हाळकर, राज्य कार्यकारिणी सदस्य संपत देसाई, जयंत निकम, दिलीप पाटील, चैतन्य दळवी, मालोजी
पाटणकर, सुरेश पाटील आदी उपस्थितीत होते.
जाहीरनामे नसल्याची खंत
श्रमिक मुक्ती दलाची ताकद राज्यातील 32 मतदारसंघात आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा येथे चांगली ताकद असून पुणे, रायगड, नवी मुंबई, नंदूरबार, औरंगाबाद, सोलापूर, लातूर आदी जिल्ह्यांतही लक्षणीय ताकद आहे. पैठण मतदारसंघातून दलाचे जिल्हाध्यक्ष सुखदेव बन निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, राजकीय पक्षांची जाहीरनाम्यांवर चर्चा होत नाही. केवळ जागा वाटपावर चर्चा होते, याची खंत वाटते. कॉंग्रेसचा पूर्वी जाहीरनामा असायचा पण आता जाहीरनामा नसतो, हे फार भयानक आहे, असे त्यांनी सांगितले.