मुंबई : शिवसेनेतील बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यातील कात्रज चौकात हल्ला झाला. या दगडफेकीत सामंत यांच्या कारची काच फुटली. घडलेल्या प्रकारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचनाही शिंदेंनी दिल्या होत्या. त्यानंतर, पोलिसांनी कारवाईला सुरुवात करत या हल्ल्याप्रकरणी शिवसेनेच्या पुणे शहराध्यक्षांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
उदय सामंत यांच्या गाडीवर पुणे येथे झालेल्या हल्ल्यानंतर रत्नागिरीत बॅनरबाजी सुरू झाली आहे. सामंत समर्थकांनी शिवसेना शाखेसमोरच जाहीर निषेधाचा बॅनर लावत उदय सामंत यांना आपले समर्थन दर्शवले आहे. तर, सामंत यांनीही ट्विट करुन या भ्याड हल्ल्यांना मी भीक घालत नाही, मी थांबवणार नाही, असे म्हटले आहे.
गद्दार म्हणता तरी शांत आहे…शिव्या घालता तरी शांत आहे..आई वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत आहे..लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल.. शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही..काळ ह्याला उत्तर आहे..अंत पाहू नका.. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
— Uday Samant (@samant_uday) August 2, 2022
शेअर केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी “काल मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुणे दौऱ्यात असताना माझ्यावर काही व्यक्तींकडून भ्याड हल्ला करण्यात आला. वैचारिक मतभेत असू शकतात मात्र,अशाप्रकारे हल्ले करणे ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती-संस्कार नाही. अशा भ्याड हल्ल्याला मी भीक घालत नाही आणि मी थांबणार ही नाही,” असे म्हटले आहे.
तत्पूर्वी त्यांनी ट्विटमधून इशाराही दिला होता. गद्दार म्हणता तरी शांत आहे… शिव्या घालता तरी शांत आहे.. आई वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत आहे..लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल… शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही..काळ ह्याला उत्तर आहे..अंत पाहू नका.. जय महाराष्ट्र असे त्यांनी म्हटले होते.