मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला आता अभाविप व भाजप नेत्यांकडून विरोध होताना दिसतोय. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे एटीकेटी आणि बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होईल असा दावा देखील केला जात आहे.
याबाबतचा वाढत संभ्रम पाहता आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत एक व्हिडीओ संदेश देत कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही अशी ग्वाही दिली.
व्हिडीओ संदेशामध्ये बोलताना, “एटीकेटी आणि बॅकलॉगबाबत विद्यार्थ्यांच्या मनात शंका असल्या तरी त्याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल आणि तो विद्यार्थ्यांच्या हिताचाच असेल,” असं स्पष्टीकरण सामंत यांनी दिलं.
“महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या मनातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापू्र्वीच घेतला आहे. त्या निर्णयानंतर एटीकेटी आणि बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात संभ्रमाचं वातावरण निर्माण होत आहे किंवा काही जण ते जाणीवपूर्वक निर्माण करत असतील. ज्या पद्धतीनं इतर विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निर्णय घेतला आहे. तसाच योग्य निर्णय योग्य वेळी जाहीर केला जाईल,” असं देखील सामंत म्हणाले.
“यासंदर्भात कोणीही मनात शंका ठेवू नये, तसंच कोणत्याही संभ्रमावस्थेला आणि गैरसमजाला बळी पडू नका. यासदर्भातील चर्चा युद्धपातळीवर सुरू आहे,” असं आवाहन त्यांनी केलं.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/3352690881429750/