Sindhudurg News : कोकणात ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहे. अनेक विश्वासू शिलेदार उद्धव ठाकरेंची साथ सोडत आहेत. अशातच आता सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी थेट महाविकास आघाडीला इशारा दिला आहे. या वर्षीचा निधी संपला की, ३१ मार्चनंतर गावाच्या याद्या घेऊन बसणार. जिथे जिथे उबाठा आणि महाविकास आघाडीचे सरपंच पदाधिकारी असतील, त्या गावांना एक रुपयाचाही निधी देणार नाही, असा इशाराच राज्याचे मत्स्य व्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे.
त्यांच्या या विधानाची सध्या राज्यभर चर्चा होत आहे. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये तालुका कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी नितेश राणे बोलत होते.
काय म्हणाले नितेश राणे?
नितेश राणे म्हणाले, मी तुम्हाला विश्वास देतो की, येणाऱ्या दिवसांत जिल्हा नियोजनचा निधी असेल, सरकारचा कुठलाही निधी असेल, तो फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना मिळेल. बाकी कोणालाही मिळणार नाही. कोणालाच मिळणार नाही. मी माझ्या लोकांना सांगितले आहे की, उबाठा आणि महाविकास आघाडीचे सरपंच असलेल्या गावांची यादी काढा. जिथे जिथे उबाठा किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील, पदाधिकारी असतील, त्या गावात एका रुपयाचाही निधी देणार नाही. एवढं मी तुम्हाला आजच सांगतो. काहीच देणार नाही, असं विधान नितेश राणे यांनी केले आहे.
पुढे म्हणाले, कोणाला गावाचा विकास करायचा असेल, तर इथे येऊन प्रवेश करून जा, भरघोस काम होतील, नाहीतर विकास होणार नाही. आपला कार्यक्रम सोपा आणि स्पष्ट असतो. आपण हातचं राखून ठेवत नाही. त्याची चिंता करू नका. हे भाषण ऐकून उरले सुरले कोण असतील, तर आताच सांगा. चव्हाण साहेबांची वेळ आम्ही घेतो. पुढची तारीख बुक करून टाकू, असंही नितेश राणे यावेळी म्हणाले.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचा बालेकिल्ला असून तो आणखी मजबूत झाला आहे. अनेकांनी येथील मेळाव्यात प्रवेश केला आहे. यामुळे आता सिंधुदुर्गातील जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करायचे असल्याचे प्रतिपादन पक्षाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. चव्हाण म्हणाले, मी कोकणातला सुपुत्र म्हणून राज्य सदस्य नोंदणी प्रमुखपदी काम करत आहे. तशीच जबाबदारी कोकण सुपुत्र विनोद तावडे यांच्याकडे संपूर्ण देशभराची आहे.