अँटिग्वा – भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाचा कर्णधार यश धुल याने आपल्या यशाचे श्रेय माजी कसोटीपटू व राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण यांना दिले आहे.
अकादमीत लक्ष्मण यांच्याशी सातत्याने संवाद साधत होतो व ते माझ्या खेळाचे बारकाईने निरीक्षणही करत असत. त्यांनी माझ्या खेळीत सुचवलेले बदल मी गांभीर्याने सुधारले व त्यामुळेच सध्या वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत मला यश मिळत आहे, असेही धुल याने सांगितले.
दरम्यान, भारताच्या युवा संघाने गुरूवारी झालेल्या आयसीसीच्या 19 वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी पराभव केला व थाटात अंतिम फेरीत प्रवेश केला. आता भारतीय संघाचा इंग्लंडशी विजेतेपदासाठी सामना होणार असून भारतीय संघाने सलग चौथ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्याची किमया केली. शतकी खेळी करणारा भारतीय संघाचा कर्णधार यश धुल सामन्याचा मानकरी ठरला.