दुबई – अमिरातीत सुरू असलेल्या 19 वर्षांखालील युवा संघाच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने बांगलादेशचा 103 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताच्या युवा संघाने स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकात 8 बाद 243 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 38.2 षटकांत 140 धावांवर संपला. भारताकडून शेख राशीदने नाबाद 90 धावांची अफलातून खेळी केली.
अखेरच्या षटकात विकी ओत्सवालने 18 चेंडूत 28 धावांची आक्रमक खेळी करत भारताला 243 धावांपर्यंत मजल मारून दिली. बांगलादेशकडून रकीबुल हसनने सर्वाधिक 3 गडी बाद केले. भारताने विजयासाठी दिलेल्या 244 धावा करण्याचे आव्हान बांगलादेशला पेलवले नाही. बांगलादेशकडून अश्रिफुल इस्लामने सर्वाधिक 42 धावा केल्या.
अन्य फलंदाजांनी केलेल्या निराशेमुळे त्यांना हा सामना गमवावा लागला. भारताकडून राजवर्धन हंगरगेकर, रवी कुमार, राज बावा आणि विकी ओत्सवाल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. निशांत सिंधू आणि कौशल तांबेने प्रत्येकी 1 बळी घेत त्यांना सुरेख साथ दिली.
संक्षिप्त धावफलक – भारत – 50 षटकांत 8 बाद 243 धावा. (शेख रशीद नाबाद 90, विकी ओत्सवाल 28, रकीबुल हसन 3-41). बांगलादेश – 38.2 षटकांत सर्वबाद 140 धावा. (अश्रिफुल इस्लामने 42, महफिजुल इस्लाम 26, रवी कुमार 2-22, विकी ओत्सवाल 2-25, राज बावा 2-26, राजवर्धन हंगरगेकर 2-36).