दुबई – भारतीय संघाने पाकिस्तानशी अंतिम लढत होईल ही अपेक्षा केली होती. मात्र, पाकिस्तानला आशिया करंडक 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला व चाहत्यांची भारत व पाकिस्तान सामना पाहण्याची अपेक्षा अपूर्ण राहिली.
या सामन्यात श्रीलंका संघाला 44.5 षटकांत 147 धावाच करता आल्या. त्यात यासिरु रॉड्रीगो व मथीशा पथरना यांनी प्रत्येकी 31 धावा केल्या. पाकिस्तानकडून झिशान जमीरने 4 गडी बाद केले. विजयासाठी 148 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 49.3 षटकांत 125 धावांवर संपला व श्रीलंकेने 22 धावांनी विजय प्राप्त करत अंतिम फेरी गाठली.
पाकिस्तानकडून अहमद खान 36 व महंमद शेहजादने 30 धावा केल्या. श्रीलंकेकडून त्रिवेण मॅथ्युने 4 तर, दुनीत वेलागेने 3 गडी बाद केले. आता शुक्रवारी भारत आणि श्रीलंका यांच्यात विजेतेपदाची लढत होणार आहे.