नवी दिल्ली – स्वस्तात कांदा विकणाऱ्या दोन तरुणांना थेट तुरुंगाची हवा खावी लागली आहे. हे प्रकरण मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरचे आहे. अजय जाटव आणि जितू वाल्मिकी अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत.
देशभरात गेल्या दोन महिन्यांपासून कांदा तब्ब्ल २०० रुपयांनी विकला जात होता. सध्या बाजारात कांद्याचा भाव ८० ते १०० रुपये किलो आहे. अश्यातच या दोघांनी १० ते २० रुपये किलो कांदा विकला आहे. इतक्या स्वस्तात कांदा मिळत असल्याने लोकांनी तो भरपूर प्रमाणात विकत घेतला आणि काही मिनिटांमध्येच हा सर्व कांदा संपला. या दोघांनी जवळपास ५० किलो कांदा विकल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या दोघांना स्वस्तात कांदा विकला म्हणून अटक झाली नसून त्यांनी विकलेला हा सर्व कंदा चोरीचा होता. म्हणून त्यांना अटक करण्यात आली आहे. अजय आणि जितू हे दोघे एका गोदामात घुसले होते. तिथून त्यांनी हा कांदा लंपास केला आणि बाजारात स्वस्तात विकला. या कांद्याची किंमत जवळपास ६० हजार रूपये इतकी होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी या दोघांना बऱ्याच मेहनतीनंतर शोधलं आणि अटक केलं. अटक केल्यानंतर दोन्ही आरोपींनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे. कांद्याच्या वाढत्या दरांमुळे त्रस्त झाल्याने आपण ही चोरी केल्याचं या दोघांनी सांगितलं आहे.