मुंबई : आजपासून बरोबर दोन वर्षापूर्वी राज्यात एक ऐतिहासिक घटना घडली. ऐतिहासिकच म्हणावे लागेल कारण माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी सोहळा आजच्याच झाला होता. या शपथविधीला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली तर अजित पवार यांना उप मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. राज भवनात हा शपथविधी पार पडला होता.
राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या युतीने देशभरात खळबळ माजवली होती. अडीच दिवस टिकलेल्या या सरकारची सर्वत्र चर्चा झाली. अल्पवधीतीच सरकार कोसळले अन् यामुळे देवेंद्र फडणवीस यांना टीकेचा सामना करावा लागला. आजही फडणवीस यांच्या मनात ही सल कायम आहे. जाहीर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी करुन चूक केल्याचे बोलून दाखवले आहे.
23 नोव्हेंबर 2019 रोजी राज्यात मोठा राजकीय भूकंप घडला होता. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं सरकार स्थापन करण्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हाताशी धरुन पहाटेच शपथविधी कार्यक्रम केला होता. राज भवनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण फक्त अडीच दिवसात हे सरकार कोसळले.
शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदाराचे बंड मोडून काढले होते. त्यामुळे अजित पवार यांच्या पाठीशी असणारी ताकद कमी झाली अन् पहाटेचा शपथविधी पार पडलेलं सरकार अल्पमतात आलं. त्यामुळे अखेर फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला. या घटनेनंतर फडणवीस यांना टीकेचा सामना करावा लागला होता.