फलटण (प्रतिनिधी) – शरयू ऍग्रो इंडस्ट्रीज या साखर कारखान्याच्या मळी वाहतूक करणाऱ्या टॅंकरवरील मद्यधुंद चालकाने फलटण-सातारा रस्त्यावर मळी सोडल्याने दोन वाहनचालक जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. टॅंकरचालक भरधाव वाहन चालवित असताना परिसरातील ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून त्याला पकडले.
टाकूबाचीवाडी (कापशी), ता. फलटण येथे शरयू ऍग्रो इंडस्ट्रीज हा साखर कारखाना आहे. गळीत हंगाम संपल्याने कारखान्यात प्रक्रिया केलेल्या मळीची विल्हेवाट लावण्यासाठी मल्लिकार्जुन ट्रान्सपोर्ट या ठेकेदारामाफत मळी वाहतूक आदर्की, कापशी, आळजापूर परिसरात सुरू आहे. मळी कारखान्यापासून दूरवर ओतली जाते. ही मळी जमिनीवर ओतल्यास मुरूम, दगडगोटे भुसभुशीत होते, असश शेतकऱ्यांना वाटते. त्याचा फायदा घेत ही मळी शेतकऱ्यांच्या शेतात मोफत सोडली जाते.
आदर्की, कापशी, आळजापूर परिसरातील शेतात मळी टाकण्यासाठी टॅकर फिरत आहेत. त्यातील एमएच-12 क्यूजी-0329 या क्रमांकाच्या टॅंकरमधून रविवारी दुपारी एका शेतकऱ्याच्या शेतात मळी टाकण्यात आल्यानंतर चालकाने टॅंकरचा व्हॉल्व्ह तसाच सुरू ठेवला होता. हा चालक मद्यधुंद अवस्थेत फलटण-सातारा रस्त्याने भरधाव टॅंकर चालवित असताना मळी सांडून रस्ता निसरडा झाला. त्यामुळे दोन मोटारसायकली घसरून दोन स्वार जखमी झाले. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मळी वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांनी दक्षता घ्यावी. रस्तावर मळी न सांडण्याची दक्षता घेण्याबाबत टॅंकरचालकांना सक्त ताकीद द्यावी, अशी प्रतिक्रिया सरपंच सौरभ निंबाळकर यांनी व्यक्त केली.