ओतूर – या पावसाने शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ओतूर मंडळ कृषी विभागातील सध्या कांद्याच्या लागवडीचे क्षेत्र असणाऱ्या पिकाला देखील शेतात पाणी साठून भिजवले असल्याने त्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्याचे ओतूरचे मंडल कृषी अधिकारी हरीश माकर यांनी सांगितले.
या परिसरात दोन हजार हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवडी झाल्या असल्या तरी मात्र याही कांद्याला अवकाळीची बाधा होईल यामुळे बळीराजा चिंतातूर झाला आहे. या भागातील कांद्याला बाजारपेठांमधे चांगली मागणी असते. यंदा लागवड झालेल्या कांद्याचे व काही ठिकाणी रोपांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
त्यामुळे कांदा वांदा करील की काय, अशी भीती शेतकरी वर्गात आहे. ओतूर, रोहोकडी, आंबे गव्हाण, पाचघर, चिल्हेवाडी, उदापूर, डिंगोरे या भागात मोठ्या प्रमाणावर व दर्जेदार कांदा पिकविला जातो. मागील वर्षी ओतूर विभागात पाच हजार हेक्टर कांद्याचे क्षेत्र होते.
रोहोकडी मध्ये 398 हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी 200 हेक्टर, उदापूर येथे 1100 हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी 450 हेक्टर, डिंगोरे येथे 2100 भौगोलिक क्षेत्रापैकी 800 हेक्टर, पचघर येथे 500 हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी पैकी 150 हेक्टर, चिल्हेवाडी येथे 400 हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी 45 हेक्टर,
आंबेगव्हाण येथे 1500 हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी 180 हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड करण्यात आली होती. तर या वर्षी सध्या ती निम्मीदेखील झाली नाही. या अवकाळीमुळे पुढील काळात रोपांना फटका बसून लागवडीचे प्रमाण देखील घटण्याचा संभाव्य धोका निर्माण झाला असल्याचे कृषी आधिकरी हरीश माकर यांनी सांगितले.
शेतात पाणीच पाणी साठल्याने सुरु असलेली लागावड देखील सोडावी लागली असल्याचे चित्र दिसत होते. शेतात कांदा रोपे तशीच्या तशी पडुन होती.