रामदास सांगळे
बेल्हे – जुन्नर तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या चक्रीवादळाने आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे. जुन्नर तालुक्यातील 1 हजार 25 हेक्टर क्षेत्रातील फ ळबागा चक्रीवादळाने नुकसानग्रस्त झाल्या आहेत. काही झाडे पडली असून मोठ्या संख्येने आंबेही गळून पडले आहेत. शासन हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यास विचारधीन आहे. त्यामुळे तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे 5 कोटी 12 लाख 50 हजारांचे नुकसान झाले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, कृषी सभापती बाबुराव वायकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, पंचायत समिती सभापती विशाल तांबे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, शरद लेंडे, जिल्हाधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांनी विविध गावांतील बागेची पाहणी केली. नुकसानीची पाहणी करण्यासाठी नेते मंडळींनी धडाका लावला होता.त्यापटीत शेतकऱ्यांना भरपाई मिळणार का, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
माझ्या आंब्याच्या बागेत केशव, रत्ना, बदामी हापूस, पायरी आदी प्रकारच्या एकूण 50 आंब्याच्या झाडांचे सर्व आंबे गळून पडले आहेत. शंभर टक्के नुकसान झाले आहे. सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामा केला आहे. शासनाने शेतकऱ्यांना भरीव स्वरूपात मदत करावी. शासनाने कमीत कमी उत्पादन खर्च तरी शेतकऱ्यांच्या पदरात टाकावा.
-दत्ता खोमणे, आंबा उत्पादक, बेल्हे.
जुन्नर तालुक्यातील 1 हजार 25 हेक्टर आंबा फळबागांचे क्षेत्र बाधित झाले आहे. काही ठिकाणी आंब्याच्या झाडाचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी संपूर्ण आंबे वादळाने पडले आहेत. कृषी व महसूल विभागाकडून पंचनामा करण्याचे काम पूर्ण झाले असून लवकर शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे.
-एस. के. शिरसाट, कृषी अधिकारी, जुन्नर.
उत्पादन खर्चही निघता निघेना
जुन्नर तालुक्यातील पारुंडे, येणेरे, कुसुर, सावरगाव, तांबे, माणिकडोह, बेल्हे, राजुरी यांसह अनेक गावांतील आंब्याच्या बागा नुकसानगस्त झाल्या आहेत. बागेला एकरी शेतकऱ्यांना 60 ते 70 टक्के उत्पादन खर्च येतो. यामध्ये खत, औषधे, शेताची मशागत, मजूर यांचा मोठा खर्च असतो. तर 30 टक्के नफा शेतकऱ्याला यामध्ये मिळत असतो. परंतु यावर्षी चक्रीवादळामुळे उत्पादक शेतकऱ्यांना नफा तर नाहीच पण उत्पादन खर्चही निघाला नाही. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात
सापडला आहे.