औरंगाबाद: करोना संसर्गाच्या वाढत्या रुग्णांमध्ये सामान्य नागरिकांप्रमाणेच अनेक नेत्यांचाही समावेश आहे. औरंगाबादमध्ये करोना संसर्गाने शिवसेनेच्या नगरसेवकांवर मोठा आघात केला आहे. मागील दोन दिवसांमध्ये औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. नितीन साळवे आणि रावसाहेब आमले असे या नगरसेवकांचे नाव आहे. या घटनेने औरंगाबादमधील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये शोकाकुल वातावरण आहे.
शिवसेनेचे नगरसेवक रावसाहेब आमले यांना करोनाचा संसर्ग झाला होता. उपचारादरम्यानच आज त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी शिवसेनेचे अन्य एक नगसेवक नितीन साळवे यांचाही करोनामुळे मृत्यू झाला होता. सलग दोन दिवसांत दोन नगरसेवकांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाकडून रुग्णांचा मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजनांवर भर दिला जात आहे.
रावसाहेब आमले या नगरसेवकांवर औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना आज प्लाझ्मा थेरपी दिली जाणार होती. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवसेनेच्या या दोन नगरसेवकांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबासह शिवसेना पक्षाचं मोठं नुकसान झाल्याची भावना शिवसैनिक व्यक्त करत आहेत.
नितीन साळवे यांच्यावर मागील 7 दिवसांपासून उपचार सुरू होते. ते औरंगाबादच्या बालाजीनगर वॉर्डतून निवडून आले होते. त्यांच्यावर 7 दिवस उपचारानंतरही त्यांची प्रकृती बिघडत चालली होती. अखेर मंगळवारी (7 जुलै) उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.