मुंबई – राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधान भवन परिसरात दिवसभरात दोन जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे मंत्रालय परिसरात काही काळ खळबळ उडाली.
मंगळवारी सायंकाळी मंत्रालयाच्या टेरेसवर चढून एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. फायर ब्रिगेडचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने आत्महत्या करणाऱ्यास वाचवण्यात आले आहे. ही व्यक्ती कोण आहे? कोणत्या मागणीसाठी तो व्यक्ती मंत्रालयाच्या टेरेसवर चढला होता? याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. आमदार निलेश लंके यांनी मध्यस्थी करत या व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत.
तत्पूर्वी, सकाळी पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधान भवनाच्या बाहेर उस्मानाबादच्या एका शेतक-याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रॉकेल अंगावर टाकत त्या तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवण्यात यश आले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उस्मनाबादमधील वाशी तालुक्यातील तांदूळवाडी गावचे रहिवासी सुभाष उंदरे असे आत्महत्येचा प्रयत्न करणा-याचे नाव आहे.