वाकड, रहाटणीतील घटना : 21 लाख 55 हजारांचा ऐवज लंपास
पिंपरी – एकाच रात्रीत वाकड आणि रहाटणीत सराफांची दोन दुकाने फोडण्यात आली. यामध्ये 21 लाख 55 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत मनोहर पूनसिंग चौहान (वय 30, रा. नखाते वस्ती, रहाटणी) यांनी गुरुवारी (दि. 16) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री नऊ ते गुरूवारी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान फिर्यादी यांचे बळीराज कॉलनी, काळेवाडी येथील अंबिका ज्वेलर्स नावाचे दुकान कुलूप लावून बंद होते. या कालावधीत चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटले. तसेच आतील लोखंडी ग्रिल कापून दुकानात प्रवेश केला. दुकानातील दोन लाख 40 हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने चोरून नेले. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत प्रविण रामचंद्र देवकर (वय 36, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी गुरुवारी (दि. 16) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवकर यांचे कस्पटे वस्ती, वाकड येथे कनक ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदी विकीचे दुकान आहे.
बुधवारी रात्री नऊ ते गुरूवारी सकाळी सात वाजताच्या दरम्यान फिर्यादी देवकर यांचे दुकान कुलूप लावून बंद होते. त्यादरम्यान चोरट्यांनी दुकानाचे सेंट्रल लॉक तोडून शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 19 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. देवकर यांच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. आपण चोरी केली आहे, हे सीसीटीव्हीद्वारे पोलिसांना माहिती मिळू नये म्हणून चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग करणारा 15 हजार रुपये किंमतीचा डीव्हीआरही चोरून नेला. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
ते पथक काय करते?
गेल्या काही दिवसांपासून शहरात एटीएम चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेचे कर्मचारी यांना संयुक्तरित्या गस्त घालण्यासाठी नियुक्त केले आहे. हे पथक फक्त शहरातील एटीएम आणि सराफांची दुकाने यावर नजर ठेवणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले होते. असे असतानाही शहरात अजूनही एमटीएम बाबतचे गुन्हे घडत असून सराफांच्या दुकानाही चोऱ्या होत आहे. यामुळे गस्तीवरील हे पथक नेमके करते तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच एकाच रात्रीत सराफांची दोन दुकाने फुटल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.