टाटा आणि अदानी समूह विकत घेणार नवा संघ
मुंबई – इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) पुन्हा एकदा दहा संघ पाहायला मिळणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएलमधील संघ संख्या 8 वरून 10 करण्याचा निर्णय घेतल्याचे असून या नव्या दोन संघांसाठी टाटा (रांची, जमशेदपूर), अदानी ग्रुप (अहमदबाद) आणि आरपीजी संजीव गोयंका (पुणे) या संघ मालकांमध्ये आपला संघ स्पर्धेत उतरवण्याची चुरस पहायला मिळणार आहे.
2011 साली आयपीएल स्पर्धेत अशाचपद्धतीने दोन नवीन संघ उतरवण्यात आले होते. मात्र त्यावेळी बीसीसीआयचा हा प्रयोग फसला होता. 8 वर्षांनी देशातील प्रमुख उद्योगसुमहांनी नवीन संघांसाठी बोली लावण्याची तयारी दाखवल्यामुळे आगामी काळात दोन नवीन संघ स्पर्धेत दिसू शकतात. या संदर्भातील आराखडा देखील तयार झाला आहे, दोन नविन संघ स्पर्धेत खेळणार हे आता नक्की झाले आहे. आता फक्त निविदा प्रक्रिया कशी पार पाडली जाते हे पहावे लागणार आहे.
मागील आठवड्यात आयपीएल फ्रॅंचायझी मालक आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांमध्ये लंडन येथे एक बैठक झाली. त्यात 2020च्या आयपीएलमध्ये दोन नवीन संघांचा समावेश करण्याचा मुद्दा ठेवण्यात आला आणि 2021मध्ये हे संघ खेळतील. बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनीही बैठक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला, परंतु त्यात काय चर्चा झाली हे त्यांनी सांगितले नाही.
अदानी ग्रुपचा 2010 साली अहमदाबाद फ्रॅंचायझी विकत घेण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. आता पुन्हा एकदा त्यांनी कंबर कसली आहे. अहमदाबाद येथे एक लाख प्रेक्षकक्षमतेचे स्टेडियम बांधून तयार आहे. 2016-17मध्ये पुणे सुपरजायंट्सचे मालक संजीव गोयंकाही पुन्हा आयपीएलमध्ये कमबॅकसाठी प्रयत्नशील आहेत.
यांच्याव्यतिरिक्त टाटा समूहीही जमशेजपूरची फ्रॅंचायझी उतरवण्यासाठी सज्ज आहेत. शिवाय लखनौ आणि कानपूर याही शहरातून संघ आयपीएलमध्ये खेळण्यास उत्सुक आहेत. 2010च्या आयपीएलमध्ये खेळलेल्या आणि नंतर बरखास्त केलेला कोचि टस्कर्स केरला संघही पुनरागमनाच्या तयारीला लागला आहे. आता हा फॉर्म्युला किती यशस्वी होतो हे येणारा काळच सांगेल.