औरंगाबाद : कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. औरंगाबाद शहरात आणखी दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. यादव नगर येथील एका २९ वर्षीय युवकाला तर, सातारा परिसरातील एका ४० वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या आता २० वर पोहचली आहे. शहरात भीतीचे वातावरण असून कोणीही घराबाहेर पडू नये असे अवाहन प्रसाशनातर्फे करण्यात येत आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद शहरात सलग ४ दिवस कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. मात्र शुक्रवारी एकही कोरोनाबाधित व्यक्ती शहरात आढळून आला नव्हता. शुक्रवारी रात्री दोन कोरोनाबाधितांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली. शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतचं असल्याने आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे. तर एका कोरोनाबाधित रुग्णाचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णलयात (मिनी घाटी) चिकलठाणा येथे ७५ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १३ जणांना कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना घरातच विलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. तसेच नवीन ७५ जणांना रुग्णालयात भरती केले असून,५७ जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले. तर, ४८ जणांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे ते म्हणाले. सध्या एकूण 15 कोरोनाबाधित रुग्णांवर मिनी घाटीत उपचार सुरू आहेत. तर देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्या रुग्णांपैकी 42 जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.