महाराष्ट्र- कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी माणसांचा गेली अनेक वर्षांपासून जो लढा सुरु असून हा लढा संपत नाही तोपर्यंत राज्य सरकार शंभर टक्के सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी आहे, असा दिलासा देतानाच सीमा भागातील लोकांवर होत असलेला अन्याय, तेथील समस्या सोडविण्यासाठी राज्य शासनातर्फे दोन मंत्र्यांची नियुक्ती केली जाईल, असे आश्वासन मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
सीमा भागातील मराठी भाषिकांवर कानडी सरकारकडून होणाऱ्या अत्याचाराबाबत सीमावर्ती भागातील बेळगाव, कारवार, निपाणी येथील विविध संघटनांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. सीमावर्ती भागातील बेळगाव, कारवार, निपाणी येथील बंद पडलेल्या मराठी शाळा पुन्हा सुरु करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे निधी दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. सीमावर्ती विभाग हा महाराष्ट्रात आणण्यासाठी आणि येथील मराठी शाळा जीवंत ठेवण्यासाठी हा लढा आहे.
संविधानाच्या मर्यादेत राहून आपण हा लढा सुरु ठेवू. तसेच या भागातील मराठी भाषा जीवंत राहावी व तिचे संवर्धन व्हावे यासाठी फ्रि टू एअर सेवेच्या माधमातून कार्यक्रमाचे प्रसारण करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.