मेढा -केळघर परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अवघड जागेतून वाट काढत, चिखल तुडवत पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई शेतकऱ्यांच्या बांधावर गेले.
राज्य सरकार आपल्या पाठीशी असून झालेल्या नुकसानीचे पंचनामे ताबडतोब करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना या नुकसानीचा आढावा देऊन येथील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री पाटील व गृहराज्यमंत्री देसाई यांनी सांगितले .
यावेळी पालकमंत्री पाटील यांच्याबरोबर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, सभापती जयश्री गिरी, प्रांतधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवानराव मोहिते तर गृह राज्यमंत्री देसाई यांच्याबरोबर माजी आमदार सदाशिवसपकाळ, शिवसेनेचे एकनाथ ओंबळे व कार्यकर्त यांचेसह सर्व खात्याचे अधिकारी उपस्थित होते. या दोन्ही मंत्र्यांचा स्वतंत्र पाहणी दौरा झाला.
पाटील व देसाई यांनी रेंगडी येथील दोन कुटुंबांतील 4 जण पुरात वाहुन गेले. त्या कुटुंबीयांचे त्यांनी सांत्वन केले. पुरात केळघर परिसरातील बोंडारवाडी, भुतेघर, बाहुळे, केडंबे परिसराची पाहणी केली. बोंडारवाडीसह परिसरातील शेतीचे सार्वजनिक व खासगी विहिरींचे, रस्त्यावरील पुलांचे, महावितरणचे मोठे नुकसान झाले.
लवकरच पंचनामे करून झालेल्या शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचवण्यात येईल, असे आश्वासन दोन्ही मंत्र्यांनी दिले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, मोहन कासुर्डे,सागर धनावडे, संतोष कासुर्डे , विकास ओंबळे, बबनराव बेलोश ,अतिश कदम , संकेत पाटील यांचेसह परिसरातील नागरीक व शेतकरी उपस्थीत होते.
लवकर पुनर्वसन करण्याची मागणी
बोंडारवाडीसह परिसरातील ग्रामस्थांनी झालेल्या नुकसानीची माहिती पालकमंत्र्यांना दिली. यावेळी आमची नव्वद टक्के जमीन पुरात गेली असून गावाच्या दोन्ही बाजूंनी ओढ्याच्या पाण्याचा प्रभाव मोठा आहे. गावाच्या वरचा कडासुद्धा धोकादायक असल्याने आमचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे, अशी मागणी बोंडारवाडी ग्रामस्थांनी केली.