फलटण – आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर राजुरी, ता. फलटण गावच्या हद्दीत ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर (क्र. एमएच-42-एएफ-6518) व टाटा इंडिका कार (क्र. एमएच-42-ए-2482) यांची रविवारी (दि. 31 जानेवारी) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात कारमधील दोन जण ठार झाले.
याबाबत बरड पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेली माहिती अशी, आळंदी-पंढरपूर मार्गावरून रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर फलटण येथील लोकनेते साखर कारखान्याकडे निघाला होता. त्याच वेळी फलटणकडून नातेपुतेच्या दिशेने इंडिका कार निघाली होती.
राजुरी गावच्या हद्दीत हॉटेल सुरभीसमोर इंडिका कार चालकाने चुकीच्या दिशेने नेल्याने समोरून आलेल्या ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक बसली. या अपघातात कारमधील मोहन महिपती कदम (वय 55, रा. कुरवली, ता. इंदापूर, जि. पुणे) व चालक जितेंद्र उत्तम रणवरे (वय 45, रा. सणसर, ता. इंदापूर) हे गंभीर जखमी झाले होते.
त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला. याबाबत कदम यांचे मेव्हणे तेजस विष्णू यादव (रा. राजुरी, ता. फलटण) यांनी तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक संजय बोंबले तपास करत आहेत.